– जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांची उपस्थिती; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका
तिरोडा :- तालुक्यातील गांगला येथे भाऊबीजेच्या पावन पर्वानिमित्त मराठी लावणीचा आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मराठी संस्कृती जपणाऱ्या आणि ग्रामीण भागात सामाजिक एकोपा वाढविणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक करताना . बोपचे यांनी सांगितले की, “सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजातील बांधिलकी आणि ऐक्याचे प्रतीक आहेत. ग्रामीण भागातील तरुणाईने अशा परंपरा जपून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी.”
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कुठे अतिवृष्टी, कुठे महापूर, तर कुठे रोगराईमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही महायुती सरकारने शेतकऱ्यांना थेट मदत न करता फसवा पॅकेज जाहीर करून त्यांच्या भावनांची थट्टा केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणा एक वर्ष उलटूनही अमलात आलेल्या नाहीत, उलट विविध योजना बंद केल्या गेल्या. परिणामी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक काळी दिवाळी साजरी करत आहेत. हे सरकारचे अपयश नाही तर काय?”
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, युवक व महिला यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.




