– भंडाऱ्यातील बेला गावाला अभिनेत्याची सदिच्छा भेट; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद.
हंसराज,प्रतिनिधी भंडारा बेला :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत देशातील पहिले ‘नेट झिरो’ (कार्बन न्यूट्रल) गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला प्रसिद्ध मराठी अभिनेता संदीप पाठक यांनी आज विशेष भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील पर्यावरणपूरक उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या कामांची पाहणी करून ग्रामपंचायतीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
या भेटीदरम्यान संदीप पाठक यांनी ग्रामपंचायत बेला मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सौर ऊर्जेचा वापर (ऊर्जा बचत) आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. “ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी बेला गावाने जो आदर्श ठेवला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नांदागवळी, गट विकास अधिकारी प्रमोद हुमणे, पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटूले, कीर्ती गणवीर, माजी सभापती संजय गाढवे, विस्तार अधिकारी प्रदीप लांजेवार, विवेक भगत उपस्थित होते.
याप्रसंगी गणेशपूरच्या सरपंच विद्या मेहेर, मनिषा मनोज इंगळे, अर्चना प्रशांत पंचबुधे, बबिता योगीराज चवरे, राजनी अनिल बाभरे, वंदना किशोर कुथे, सुप्रिया शत्रुघ्न शेंडे, धनराज तिमाजी गाढवे, विनोद राधाकिसन नागपुरे, स्नेहल भैय्यासाहेब मेश्राम, राकेश पांडुरंग मते, श्रीकृष्ण तुकाराम वैद्य आणि सोपान आजबळे यांसह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप पाठक यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, “पर्यावरण रक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून आणि गावापासून झाली पाहिजे. बेला गावाने हे सिद्ध करून दाखवले आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शारदा मारोती शेंडे (गायधने) यांनी केले. त्यांनी गावाच्या ‘नेट झिरो’ प्रवासाचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे नेटके संचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांनी केले. या भेटीमुळे बेला ग्रामपंचायतीच्या कार्याचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे.




