हंसराज, भंडारा :- काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणीच्या स्मृती जागवत, भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याच्या वतीने ‘संविधान हत्या दिन’ पाळण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या आणि तुरुंगवास भोगलेल्या ‘मीसाबंद्यांच्या’ घरी जाऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्यांनी लढा दिला आणि अटक सहन केली, अशा मीसाबंद्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. यावेळी मीसाबंद्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, विनोद बांते, चैतन्य उमाळकर, प्रशांत खोब्रागडे, कल्याणी निखाडे, कल्पनाताई कुर्जेकर, विजय लिचडे, नितीन कडव, सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोळकर, रौनक उजवणे व राजेश वाघमारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी आणीबाणीच्या त्या काळातील घटनांना उजाळा दिला. “आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले होते, त्या काळ्या दिवसांची आठवण ठेवणे आवश्यक आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमातून लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांप्रती आदर व्यक्त करण्यात आला.




