मुंबई १ : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच भाजप आमदार आशिष देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या ३५० जातींसाठी असलेला ओबीसी कोटा आधीच अपुरा आहे. त्यामुळे या कोट्यात मराठा समाजाचा समावेश केल्यास दोन्ही समाजाचे मोठे नुकसान होईल. ओबीसी समाजाचा हक्क कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
‘मराठ्यांना आरक्षण मिळावे, पण ओबीसी कोट्यातून नको’
आशिष देशमुख यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे असे सांगितले, मात्र ते ओबीसी कोट्यातून नसावे असे त्यांचे म्हणणे आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मनोज जरांगे यांचा हट्ट आहे, पण ओबीसी समाज याबद्दल जागरूक आहे, असे ते म्हणाले. देशमुख यांनी नागपूरमधील ओबीसी महासंघाच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा असल्याचेही सांगितले.
‘दोन्ही समाजांना न्याय मिळणार नाही’
देशमुख म्हणाले की, मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास दोन्ही समाजाचे नुकसान होईल. यामुळे ना मराठा समाजाला न्याय मिळेल, ना ओबीसी समाजाला. ही वास्तविकता सर्वांनी समजून घेतली पाहिजे. दोन्ही समाजांमध्ये वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘सरकार ओबीसीमध्ये वाटेकरी येऊ देणार नाही’
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार ओबीसीमध्ये कुणालाही वाटेकरी येऊ देणार नाही, असे आश्वासन आशिष देशमुख यांनी दिले. मराठा समाजाला सध्या १० टक्के आरक्षण मिळत असून, याचा फायदा अनेक मराठा तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये होत आहे, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे आंदोलन होत असते, असेही ते म्हणाले.




