नागपूर, दि. २९ : शेतक-यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती आणि मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते. त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्य स्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप (११) व रब्बी (५) हंगामातील एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.
पीक स्पर्धेतील पीके :
खरीप पीके:- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल
रब्बी पीके:- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ५ पिके)
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख :
खरीप हंगाम : मूग व उडीद पीक :- ३१ जुलै २०२५
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल:- ३१ ऑगस्ट २०२५
रब्बी हंगाम : ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस:- ३१ डिसेंबर २०२५
पीक स्पर्धा विजेते – बक्षिसाचे स्वरूप –
अ.क्र स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये
पहिले दुसरे तिसरे
1 तालुका पातळी 5,000 3,000 2,000
2 जिल्हा पातळी 10,000 7,000 5,000
३ राज्य पातळी 50,000 40,000 30,000
खरीप हंगाम सन 202५ पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घेऊन लाभ घेण्यात यावा. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा आपल्या नजीकच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे.




