यवतमाळ :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्य स्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. यवतमाळ जिल्ह्यातही विविध ग्रामपंचायतींत ग्रामसभांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे जिल्ह्यातील १ हजार २०१ गावांमध्ये ग्रामसभेमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी थेट प्रक्षेपणाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यस्तरीय कार्यक्रमातील मार्गदर्शन प्रक्षेपित करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विशाल जाधव, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी या ग्रामसभेकरिता नियोजन करून अभियानाचा यशस्वी शुभारंभ केला. मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अनेक गावांमध्ये ग्रामसभा झाल्या. आमदार अनिल मांगूळकर हे मनपूर येथे, आमदार किसनराव वानखेडे हे कारखेड (उमरखेड) येथे उपस्थित होते. सीईओ रंजन हे खैरगाव देशमुख (पांढरकवडा) येथे उपस्थित होते.
ग्रामविकास विभाग व शासनाच्या इतर विभागातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजाणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून जीवनमाण उंचावणे, ग्राम पंचायती मध्ये लोक सहभागाची चळवळ निर्माण करणे, नागरिकांना सुलभ सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रमध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढविणे इत्यादी कामे करून तालुका जिल्हा विभाग व राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी सहभाग नोंदविणे असा आहे.
या अभियानासोबतच पोषण माह सप्ताह अंतर्गत स्थानिक आहार पद्धती प्रदर्शन आयोजित करणे, स्थानिक पालेभाज्या फळभाज्या यांचा आहार तयार करणे, स्थानिक शेतकरी व धान्य उत्पादक यांचे सोबत सुसंवाद करणे, स्थानिक उत्पादित मालाची जाहिरात करणे, स्थानिक महिला कलाकाराची समाजात ओळख निर्माण करणे, स्थानिक खाद्य पदार्थ, खेळणी वस्तू वापरा बाबत जनजागृती करणे, आदिशक्ती अभियाना अंतर्गत ग्राम समित्या स्थापन करणे इत्यादी विषयावर कामे करण्यात येणार आहेत
आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत आदी सहयोर्गीची नियुक्ती करणे, गावांचे क्लस्टर तयार करणे, आदी सेवा केंद्र तयार करणे, नोडल अधिकारी ठरविणे, आदी सहयोगीची नोंदणी करणे, ग्राम कृती आराखडा तयार करणे, आरोग्य विभाग अंतर्गत सशक्त नारी आणि सशक्त परिवार, महिलांचे प्रा.आ. केंद्रावर तपासणी शिबीरे आयोजन करणे, नमो नेत्र अभियान राबविणे, मीझल्स रूबेला लसीकरण राबविणे ईत्यादी बाबत माहिती ग्रामसभेत देऊन याबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे सदर ग्रामसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे.
सदरील ग्रामसभेच्या यशस्वितेसाठी सर्व विभाग प्रमुख यांना पालक अधिकारी म्हणून प्रत्येकी एक तालुक्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ग्रामसभेच्या यशस्वितेसाठी सर्व गट विकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील सर्व कर्मचारी आणि पंचायत समिती स्तरावरील सर्व विस्तार अधिकारी पंचायत यांनी सहकार्य केले.




