– जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
यवतमाळ :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत केळापूर तालुक्यातील घोणसी येथे 5 मेगावॅट प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला.
रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतक-यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय लक्षात घेता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही अत्यंत महत्वपूर्ण योजना शासनाने आणली. त्यामुळे वीजपुरवठ्याचा विश्वासार्ह स्त्रोत निर्माण होऊन परिसरातील शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा शक्य होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत घोणशी येथे 7 मेगावॅट प्रकल्पाची निर्मिती नियोजित असून, त्यापैकी 5 मे. वॅ. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पाचा आज शुभारंभ झाला. परिसरातील 1 हजार 705 शेतक-यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
‘महावितरण’चे अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे, उपकार्यकारी अभियंता संजय बोबडे, सहायक अभियंता प्रीती महाडोले यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.




