कामठी २२ :- अशोक नगर, नागसेन नगर, जे.पी. नगर तसेच न्यू खलाशी लाईन परिसरातील नागरिक मागील काही महिन्यांपासून नळपाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी नोंदवूनही योग्य तो तोडगा निघालेला नाही.
मागील ५ ते ६ महिन्यांपासून सकाळच्या वेळी नळांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे परिसरातील कुटुंबांना पिण्याचे तसेच दैनंदिन वापरासाठी पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. या समस्येमुळे घरगुती महिला व वृद्ध नागरिकांना विशेषत: मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांना लेखी निवेदन सादर केले आहे. यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड असेल किंवा पाण्याचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याची तातडीने दखल घेऊन नागरिकांना योग्य तो पुरवठा करावा.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सदर वस्त्यांतील लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू देऊ नये. तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
स्थानिक नागरिकांनीही नगरपरिषदेकडे अपेक्षा व्यक्त केली आहे की, पाणी हा मुलभूत हक्क असून या संदर्भात तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात. शिष्टमंडळात नागसेन गजभिये, माजी नगर सेविका रमा गजभिये, प्रकाश देशभ्रतार, विनोद गजभिये, सुशीला खांडेकर, संजय डोंगरे, शीला गजभिये, भिवा मेश्राम, चांगोना बागडे, तुषार बागडे, किरण देशभ्रतार, मदन मेश्राम, कांता वाघमारे आदींचा समावेश होता.




