नागपूर २८: बिहारमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘वोट अधिकार यात्रा’ला देशभरातून प्रतिसाद मिळत असून, त्याच्या समर्थनार्थ नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पूर्व नागपुरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली.
ही रॅली प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पूर्व नागपूरचे आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. टेलिफोन एक्सचेंज चौक येथून सुरुवात करून रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचली. ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘लोकशाही वाचवा – संविधान वाचवा’, ‘राहुल गांधी जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीमध्ये प्रदेश, शहर पदाधिकारी, पूर्व नागपूर काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल आदींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मशालींच्या उजेडात निघालेल्या या रॅलीमुळे परिसरात आंदोलनात्मक वातावरण निर्माण झाले होते.
रॅली संबोधित करताना आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले की, देशातील लोकशाहीवर अन्यायकारी सरकारकडून गदा आणली जात आहे. जनतेचा मतदानाचा हक्क हा संविधानाने दिलेला आहे. तो कुणालाही हिरावून घेऊ देणार नाही. राहुल गांधी यांच्या लढ्याला आम्ही नागपुरातून बळ देत आहोत.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या रॅलीतून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ‘संविधानाचे रक्षण करा’, ‘गरिब-कामगार-किसान यांच्या न्यायासाठी लढा द्या’ असे संदेश दिले. मशाल रॅलीत महिलांची मोठी उपस्थिती लक्षणीय होती.




