– आठवड्यातून किमान तीन दिवस सेवा सुरू ठेवण्याची मागणी; धम्मचक्र प्रवर्तन दिन व आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी
संदीप कांबळे,कामठी :- नागपूरहून बोधगया येथे जाणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या प्रवासाची सोय अधिक सुलभ करण्यासाठी दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे सुपरफास्ट रेल्वेगाडीत रूपांतर करावे, तसेच ही गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस सुरू ठेवावी, अशी मागणी सुलेखा कुंभारे व रंजन कुमार यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट घेऊन सादर निवेदनातून केले.
नागपूर आणि विदर्भातील बौद्ध अनुयायांसाठी बोधगया हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. दीक्षाभूमी एक्स्प्रेसच्या माध्यमातून या प्रवासाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले असले, तरी गाडीची वारंवारता आणि प्रवासाचा कालावधी यामुळे अनुयायांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गाडीला सुपरफास्ट दर्जा देऊन प्रवासाचा वेळ कमी करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
दीक्षाभूमी एक्स्प्रेस आठवड्यातून किमान तीन दिवस सुरू राहिल्यास बौद्ध अनुयायांना बोधगया येथे जाण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. धार्मिक कार्यक्रम, धम्मदीक्षा, विहारदर्शन तसेच विविध बौद्ध उपक्रमांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होऊ शकतो.
दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. या दोन्ही धार्मिक कार्यक्रमांना देशभरातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित राहतात. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे सुपरफास्टमध्ये रूपांतर, आठवड्यातून किमान तीन दिवस सेवा आणि धार्मिक सोहळ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या या मागण्यांबाबत रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुलेखा कुंभारे व रंजन कुमार यांनी व्यक्त केली.





