spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सीसीआय’च्या मनसर केंद्रावर कापूस खरेदीस प्रारंभ

– सभापती सचिन किरपान यांचे हस्ते शुभारंभ‎

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- मनसर येथील श्रीराम जिनिंग प्रेसिंग मिल येथे नुकताच सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. २०२५-२६ च्या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत शासकीय कापूस खरेदी केंद्राचे कृउबा समितीचे सभापती सचिन किरपान यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या कापूस खरेदीचा थाटात शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी खरेदी केंद्रावर आलेल्या कापसाची तपासणी करण्यात आली असता, कापसातील ओलाव्याचे प्रमाण ८% पेक्षा कमी आढळले. त्यामुळे या शेतकऱ्याला प्रती क्विंटल ८११० रुपये हा किमान आधारभूत किंमत दराने मिळाला आहे. रामटेक तालुक्यात (सिसिआय) हे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. शुभारंभाप्रसंगी कृउबा समितीचे सभापती सचिन किरपान, जिनिंगचे मालक सौरभ चौकसे, कृउबा समितीचे सचिव हनुमंता महाजन, सीसीआयचे कापूस केंद्र प्रमुख राहुल काहरे व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती सचिन किरपान यांनी, शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि गैरसोय थांबवण्यासाठी रामटेक तालुक्यात हे केंद्र सुरू होणे किती महत्त्वाच होत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले की, योग्य भाव आणि अचूक वजन मिळावे यासाठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी ‘कपास किसान अँप’ वर आपली नोंदणी करून आपला कापूस विक्रीकरिता शासकीय खरेदी केंद्रावर आणावा. नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. खासगी व्यापारी सध्या ६८०० रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे घट नुकसान टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी त्वरीत ‘सीसीआय’च्या अँपवर नोंदणी करावी. असे आवाहन त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले.

खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबेल

केंद्रप्रमुखांनी यावेळी शेतकऱ्यांना आवाहन केले की, कापसाचा दर्जा व ओलाव्याच्या प्रमाणानुसार दर निश्चित केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कापूस केंद्रावर आणावा. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व शासनाने ठरवून दिलेला भाव मिळेल, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

नोंदणीची मुदत वाढवली

या वर्षीच्या अतिवृष्टी, कीडरोग आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी सीसीआयने किसान अ‍ॅपवरील नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री हमीभावाने (एमएसपी) करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.