– आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
काटोल :- नरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसह इतर शेतकरी हिताच्या मागणीसाठी काटोल येथे आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य सचिव सुनील वडस्कर यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी काटोल यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. सन २०२६ च्या पावसाळ्यात दि. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत विधानसभा क्षेत्रात केवळ १२५ मी.मी.पाऊस झालेला आहे. सदर क्षेत्रातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ८७६ ते ११०० मि.मी. इतके आहे, त्या तुलनेत यावर्षी झालेला पाऊस अत्यंत अपुरा असून पावसाच्या मोठ्या तुटवडा मुळे शेतकऱ्या समोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तुर, भुईमूग, भाजीपाला, तसेच संत्रा मोसंबीच्या प्रमुख पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडलेला आहे. सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून शेंगा भरण्यावर परिणाम झाला आहे. कापूस पिकाची पाते गळण्यास सुरुवात झाली आहे. संत्रा मोसंबीच्या फळाची मोठ्या प्रमाणात गळ झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसा अभावी तलाव व धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. पातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे काटोल नरखेड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्याच प्रमाणे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना वन्यप्राणी व वन्य जीवांच्या वाढत्या उपद्रवामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे काटोल नरखेड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा व वन्य जीवांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करावे अशी मागणी आम आदमी पार्टी च्यावतीने याप्रसंगी करण्यात आली. यावेळी काटोल नरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान १ लाख रु. प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी, वन्यजीव व वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी, संत्रा मोसंबी व इतर फळबागांचे नुकसान झाल्यामुळे फळबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्ज माफीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी व कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या विज बिलात माफी देण्यात यावी व वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई स्थगित करावी, शासनाकडून मंजूर होणारी मदत थेट व पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे या मागणीसह 17 मागण्या यावेळेस शासनाकडे करण्यात आल्या. याप्रसंगी भूषण ढाकुलकर, डॉ. कैलाश कडू, अहमद कादर, प्रकाश पाटील बोंद्रे, बाबाराव भोयर, अमोल गौरखेडे, अमोल भक्ते, निलेश पेठे, महादेवराव नखाते, धनराज तुमराम, कृष्णाजी डफरे, राजेंद्र ठाकरे, जयश्रीताई बंड, रोशनी बाजनघाटे, उत्तमराव वानखेडे, अंगद भैसवार, डॉ. गजभिये, गजानन बोंद्रे, केतन वानखेडे, कृष्णाजी ठाकरे, दिलीप वैद्य, गिरीश शेंडे, रामराव भाकरे, प्रशांत तागडे, ज्ञानेश्वर तिडके, प्रशांत घाडगे, गजानन धोटे, भोजराज मोहरीया, प्रकाशजी देशभ्रतार, सुनील गायकवाड, मंगेश चौधरी, विकास गिरे, निशांत गजभिये, विनोद क्षीरसागर, यांच्यासह काटोल नरखेड तालुक्यातून शेकडो शेतकरी उपस्थित होते.





