– सोनेगाव (राजा) येथील शेतकऱ्यांचा आरोप; जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे निवेदन, चौकशी करून कारवाईची मागणी
कामठी :- शासनाच्या ई-पिक पाहणी प्रक्रियेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप कामठी तालुक्यातील सोनेगाव (राजा) येथील शेतकऱ्यांनी केला आहे. काही कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा गावातील काही शेतकऱ्यांकडून ३०० रुपये, तर काहींकडून ई पीक पाहणी च्या नावाखाली अतिरिक्त रकमेची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची तातडीने प्रशासकीय चौकशी करून आरोप तथ्यात्मक आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद शासनाच्या अभिलेखात केली जाते. ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असताना तिच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारीने शासकीय प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या तक्रारीकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ई-पिक पाहणीसाठी काही शेतकऱ्यांकडून ३०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच ‘आयडी विकत घेण्यासाठी ३५ हजार रुपये खर्च आला असून त्याचे पैसे द्यावे लागतील,’ असे सांगण्यात आल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे. याशिवाय, काही शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कारणांखाली अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनधिकृत रक्कम आकारली जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास हा गंभीर प्रशासकीय गैरप्रकार ठरू शकतो. त्यामुळे पैशांची मागणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, प्रत्यक्षात किती रक्कम घेतली गेली आणि या व्यवहारामागे कोणाची भूमिका आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच भविष्यात ई-पिक पाहणीसारख्या शासकीय प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अनधिकृत वसुली होणार नाही, यासाठी प्रशासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, नागपूर आणि तहसीलदार, कामठी यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले आहे. निवेदनावर विशाल रामकृष्ण खिराडे, गौरव प्रभाकर महाले, निखिल भगत आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





