यवतमाळ, दि. १४ : भारत सरकारच्या ‘विकसित भारत’ या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र २०४७ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र २०४७ करिता व्हिजन डॉक्युमेन्ट तयार करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
विकसित महाराष्ट्रासाठी व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केला जात आहे, ज्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्र, उद्योग व सेवा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रशासन व पर्यावरणीय इत्यादी क्षेत्रांच्या क्षेत्रनिहाय अभ्यास समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांकडून व्यापक प्रमाणात सूचना, अभिप्राय मागविण्यात आले आहे. जनतेच्या सूचना, गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन सदर व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केले जाणार आहे. त्यात नागरिकांच्या नाविण्यपूर्ण आणि उपयुक्त अशा सूचनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
त्याकरिता या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग तितकाच महत्वाचा असून सर्वेक्षणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक गावातील ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा, महाविद्यालयांनी गावकरी, विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन करावे, अशा सूचना आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहे. नागरिक आपल्या सूचना https://wa.link/o93s9m या लिंकद्वारे किंवा सोबत दिलेल्या क्युआर कोडद्वारे स्कॅन करून दाखल करू शकतात.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाबाबत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे बैठक घेतली. बैठकीस विभागस्तरीय अधिकाऱ्यांसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यात शाळा, महाविद्यालयामध्ये विकसित महाराष्ट्र उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. नागरिकांना १७ जुलै पर्यंत सोबतची लिंक व क्यूआर कोडस्कॅन करून सहभाग नोंदविला येईल.




