spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेतकऱ्यांवरील संकटाचे राजकारण करू नका, शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याला प्राधान्य

– मुख्यमंत्री असताना काडीचीही मदत न करणारे उद्धव ठाकरे आज फुकटचे उपदेश देत आहेत

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची घणाघाती टीका

मुंबई :- अस्मानी संकटामुळे शेतकरी त्रस्त आहे, या संकटकाळात भाजपा- महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्वपरिने मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटींची मदत थेट जमा झाली आहे. निधीची तरतूद केली जात आहे, संबंधित विभागांकडून अधिसूचना जारी होत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महायुतीचे मंत्री, आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खंबीरपणे साथ देत आहेत. मात्र या कठीण प्रसंगात उद्धव ठाकरे आणि विरोधक घाणेरडे राजकारण करण्यात दंग आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उभे करणे हे अत्यंत गरजेचे असून उद्धव ठाकरे आणि विरोधकांनी हीन दर्जाचे राजकारण सोडून मदतीचा हात पुढे करावा असा जोरदार निशाणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी साधला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचा आक्रोश उद्धव ठाकरे यांना दिसला नव्हता. त्यावेळी घोषित केलेली तुटपुंजी मदतही पोहोचली नव्हती. हेच उद्धव ठाकरे आज उपदेशाचे डोस पाजत आहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे अशी टीकाही  उपाध्ये यांनी केली.

यावेळी उपाध्ये म्हणाले की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार शेतकऱ्यांना शब्दांचा नाही तर प्रत्यक्षात मदतीचा हात देत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली वक्तव्ये वाचून दाखवत उपाध्ये यांनी त्यांच्यावर प्रहार केला. 2020 साली अतिवृष्टी झाल्यानंतर दौ-यावर गेलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी, “मी आज कोणतीही मदत जाहीर करायला आलो नाही. पंचनामे होतील, अंदाज घेऊ आणि मग नंतर मदत जाहीर करू ” हे वक्तव्य केले होते. अक्कलकोटच्या दौ-यावेळी रेड कार्पेटवर उभे राहून ठाकरे तेथील शेतक-यांना म्हणाले होते “अजून संकट टळलेले नाही, काळजी घ्या घरात बसा. आम्ही मदत करू ”. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना उद्धव यांनी हात झटकले होते. आज मात्र मदतीवरून फुकटचे सल्ले देत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. आज राज्यावर अस्मानी संकट ओढवले असताना विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारसोबत खांद्याला खांदा लावून पूरग्रस्त भागात काम करणे अपेक्षित आहे. मात्र याही काळात आपल्या वक्तव्यांतून माथी भडकावण्याचे काम विरोधक करत आहेत असा घणाघात त्यांनी केला.

विरोधकांना या संकटकाळात विरोधीपक्ष नेत्याची खुर्ची दिसत आहे हे खरेच दुर्दैवी आहे. मागच्या काही काळातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची वक्तव्ये पाहता विरोधी पक्ष नेता नाही हेच उत्तम अशी म्हणण्याची पाळी आली असल्याचा टोला उपाध्ये यांनी लगावला. केवळ पक्ष चोरला, खंजीर खुपसला अशी बालीश वक्तव्ये केली गेली. लोकशाहीतील विरोधी पक्षाची कोणती कर्तव्य यांनी बजावली? एकही जनतेच्या हिताचा प्रश्न विरोधी पक्षांनी मांडला नाही याबाबत आत्मचिंतन करावे. ‘विरोधी पक्षांचे सकारात्मक कार्य दाखवा आणि बक्षीस घेऊन जा’ ही स्पर्धा ठेवली तर या स्पर्धेसाठी विरोधी पक्षातील एकही नेता पात्र ठरणार नाही ही शोकांतिका आहे असेही उपाध्ये यांनी अधोरेखित केले. उद्धव ठाकरे यांचा तीन तासांचा दौरा म्हणजे पूरग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.