यवतमाळ :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने विद्यापीठ स्थापन दिनाचे औचित्य साधून’विद्यापीठ शिवार फेरी दिनांक २० ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मुख्यालय, अकोला येथे होणार आहे.
या शिवार फेरीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधन, धोरणकर्ते, आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आत्याधुनिक कृषी पध्दतींबद्दल जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पध्दतींची खात्री करुन पिक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे असे असून पिक उत्पादकतेत वाढ होण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
३०० प्रगत खरीप पिक उत्पादन तंत्रांची थेट प्रात्यक्षिके, २५ एकर क्षेत्रावर सादर केली जाणार आहेत. यात तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चारा पिके, धान इ. समाविष्ट आहेत. १० खाजगी कृषी निविष्ठा कंपन्यांची प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांना नवीन कृषी उत्पादन व तंत्रज्ञानाची माहिती देतील. विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांतील ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहता येणार. महाराष्ट्रभरातून अंदाजे १ लाख शेतकरी बांधवांचा सहभाग अपेक्षित राहील.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चर्चा सत्रे, ज्यामध्ये कृषी क्षेत्रातील सध्याची आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर विचारमंथन होणार आहे. या शिवार फेरीचा भाग म्हणून २२ सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. दीपक बा. कच्छवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ यांनी केले आहे.
तसेच, डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण यांनीही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी या भव्य शिवार फेरीत सहभागी होऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.




