– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
नागपूर :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळवून देऊ, असा विश्वास खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माजी आ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे. दोन आश्वासक नेतृत्वांवर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला कोकणात बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. भाजपा संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन. जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वैभव खेडेकर यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुरेश सावंत, विलास जाधव, सुबोध जाधव, संतोष नलावडे, मनिष खवळे, मिलिंद नांदगांवकर, संजय आखाडे, रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे.




