– गडचिरोलीतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था व नागरिकांना सहभागाचे आवाहन
– ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान नागपूर येथे विशेष कक्ष; ई-मेलद्वारेही अभिप्राय सादर करण्याची सुविधा
गडचिरोली :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी नागपूर महसूल विभागातील विविध घटकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या प्रक्रियेत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना व शिफारशी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षांच्या विद्यमान पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन त्या अधिक सक्षम करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित हितधारकांशी संवाद साधून त्यांच्याकडून सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.
या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे भेट देऊन संबंधितांशी संवाद साधणार आहेत.
९ ते १५ सप्टेंबरदरम्यान विशेष कक्ष
नागपूर महसूल विभागातील नागरिक व संबंधित घटकांकडून अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात येत आहे. हा कक्ष बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
सूचना व अभिप्राय प्रत्यक्ष सादर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे प्रत्यक्ष अभिप्राय सादर करता येईल.
प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांना nagpurexamreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर दि. ९ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपले लेखी अभिप्राय, सूचना व शिफारशी पाठविता येतील.
या विषयांवर मागविल्या सूचना-
राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या विद्यमान परीक्षा पद्धती आणि कार्यपद्धतीचा आढावा; परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना; प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन आणि निकाल प्रक्रियेतील सुरक्षितता या बाबींवर सूचना अपेक्षित आहेत.
त्याचप्रमाणे डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेखीचा प्रभावी वापर; पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय; गैरप्रकारांबाबत उत्तरदायित्व निश्चित करणे; तसेच इतर राज्ये अथवा देशांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आधुनिक व सुरक्षित परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून राज्यात उपयुक्त पद्धती लागू करण्याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रांच्या निवडीसाठी आवश्यक किमान मानके, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, मनुष्यबळ व कार्यसज्जता; जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्था यांच्यात प्रभावी समन्वयाची चौकट तसेच उमेदवारांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याबाबतही नागरिकांना सूचना करता येणार आहेत.
प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणांसंदर्भातील सर्वसमावेशक अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवक विविध शासकीय भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून परीक्षा पद्धतीतील अडचणी तसेच आवश्यक सुधारणांबाबत महत्त्वपूर्ण सूचना पुढे येऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, अभ्यासिका व कोचिंग क्लासेसचे संचालक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी या संधीचा उपयोग करून विहित मुदतीत विधायक आणि ठोस सूचना सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
“आपली सूचना — अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल!” या भावनेतून जिल्ह्यातील संबंधितांनी या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.





