मुंबई :- राज्यातील मुस्लिम पसमंदा समाज आणि लहान जातींचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाला उपाययोजना सुचवण्यासंदर्भात शासनाने श्री. इद्रीस मुलतानी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली आहे. या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. या नियुक्तीचे समाजातील सर्व थरातून तसेच पक्षामधून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मुलतानी हे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
सात सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही राज्यस्तरीय अभ्यास समिती मुस्लिम पसमंदा समाज आणि लहान जातींच्या शैक्षणिक स्थितीचे मूल्यमापन, आर्थिक आणि रोजगाराची स्थिती, त्यांना मिळणाऱ्या सामाजिक आणि पायाभूत सुविधा, महिला आणि तरुणांचे सक्षमीकरण, योजनांची समीक्षा, निधीचा विनियोग याबाबत अभ्यास करणार आहे. या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक तसेच व्यावहारिक उपाययोजना आणि शिफारशी शासनाला सुचवणार आहे. डेटा संकलन, राज्यातील वेगवेगळ्या विभागांमधील मुस्लिमबहुल भागांमध्ये क्षेत्रीय दौरे, सर्वेक्षण, जनतेकडून सूचना मागवणे अशी कार्यपद्धती असलेली ही समिती एक वर्षात आपला सविस्तर अहवाल आणि शिफारशी शासनाला सादर करेल.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मुलतानी यांनी याआधी सिल्लोड पंचायत समितीचे उपसभापती, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपा प्रदेश सचिव या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.




