– विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा; ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्यावतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा पर्यंत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सदस्य जि. प. भंडारा मोहनभाऊ पंचभाई, अध्यक्षा जि. प. भंडारा कविता उईके, सभापती समाजकल्याण जि. प. भंडारा शितल राऊत, सभापती शिक्षण व बांधकाम जि. प. भंडारा नरेश ईश्वरकर, सभापती महिला बालकल्याण जि. प. भंडारा अनिता नलगोपुलवार, सभापती अर्थ व आरोग्य जि. प. भंडारा आनंद मलेवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरावी, जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळेच्या इमारती जीर्ण अवस्थेत व धोकादायक आहेत. त्या इमारती बांधकामाकरिता वाढीव निधी देण्यात यावा, जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व संगणक संच करिता निधी देण्यात यावा या मागण्यांचा निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या ७६७ शिक्षकांसह, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी अशी एकूण ८७६ पदे रिक्त आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा खालावत आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्हा परिषद च्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित पिढी निर्माण करण्याची मानसिकता वाटत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील शिक्षण वाचविण्याकरिता विद्यार्थी, पालक व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी भव्य मोर्चाच्या आयोजन केले होते.
जिल्हा परिषदच्या अनेक शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत व धोकादायक असून त्या कधीही पडू शकतात, त्यामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जीर्णावस्थेत व धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या इमारतींच्या बांधकामाकरिता वाढीव निधी तात्काळ देण्यात यावा. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक संच व सीसीटीव्ही कॅमेरा निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच शासन आणि प्रशासनाने या गंभीर प्रश्नांबाबत तातडीने पदभरती प्रक्रिया सुरु केली नाही तर विद्यार्थी, पालक, जिल्हा परिषदचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी वरील मागण्यांचा निवेदन स्वीकारून तात्काळ शासनाला कळवतो असे सकारात्मक आश्वासन देऊन त्यानंतर दि. १० मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद मुख्यालयासमोर जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती नरेश ईश्वरकर यांचे उपोषण सुरू होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना पाठवून उपोषणाला बसलेल्या नरेश ईश्वरकर यांचा निंबू पाणी पाजून उपोषण सोडविला.
यांच्यासह सदस्य व सदस्या जि. प. भंडारा सरिता कापसे, विद्या कुंभरे, पुजा हजारे, डॉ. मनिषा निंबार्ते, डॉ. स्वाती वाघाये, अनिता भुरे, गायत्री वाघमारे, विशाखा माटे, दीपा समरीत, संगीता बोरकर, संगीता नवघरे, मदन रामटेके, रमेश पारधी, यशवंत सोनकुसरे, देवा ईलमे, प्रेम वणवे, नारायण वरठे, योगिता झलके, राजु निर्वाण, पवन वंजारी, अध्यक्षा ओबीसी सेवा संघ ललिता देशमुख, प्यारेलाल वाघमारे, योगराज झलके, राजेश हटवार, अशोक कापगते, प्रदीप बुराडे, योगेश गायधने, आनंद नागोसे, अमित हुमणे, उमेश मोहतुरे, सदानंद धारगावे, धनराज साठवणे, रोहित खोब्रागडे तसेच विद्यार्थी, पालक, जिल्हा परिषदचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जिल्हा परिषद शाळांच्या इमारती कधीही पडू शकतात, अशा स्थितीत मुले शिक्षण घेत आहेत. जर पदभरती आणि निधीबाबत तातडीने निर्णय झाला नाही, तर संपूर्ण जिल्हा प्रशासनाला वेठीस धरू,” असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.




