कोल्हापूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत “पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना थांबा असे म्हणू शकत नाही,” असे विधान केले.
पंतप्रधान मोदींबद्दल भाष्य:
पवार यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि राजकारणात कटुता नसावी असे सांगितले. ते म्हणाले, “माझ्या ७५ व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. देशासाठी काही करायचे असेल तर त्यांनी करावे एवढीच आमची अपेक्षा आहे.”
शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चिंता:
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत झालेल्या नुकसानीवर पवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत म्हटले, “सरकार पंचनामे कधी करते आणि मदत कधी पोहोचवते हे पाहूया. देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावे.”
महाविकास आघाडी आणि निवडणुका:
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल का, या प्रश्नावर पवार यांनी स्पष्ट केले की सर्वत्र एकत्र लढणे शक्य नाही. स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्यांची ताकद वाढेल आणि मुंबई-ठाण्यात ठाकरे जास्त जागा मागतील, यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी नमूद केले.
हैदराबाद गॅझेट आणि आरक्षणाचा मुद्दा:
हैदराबाद गॅझेटबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, गॅझेट एक दिशा दाखवणारे आहे, मात्र त्यामुळे समाजात कटुता वाढू नये. मराठा आणि ओबीसी समाजातील वाढलेली कटुता चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. “सरकारने दोन्ही समाजांसाठी स्थापन केलेल्या समित्यांमध्ये एकाच जातीचे लोक का आहेत?” असा सवालही त्यांनी केला.
निवडणूक आयोगावर टीका:
पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. “३०० खासदारांनी प्रथमच निवडणूक आयोगावर मोर्चा काढणे ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता वाढवावी, असे आवाहन केले. तसेच, राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन करत ते म्हणाले की, “राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघत आहे.”




