नागपूर ५ : नागपूर शहरात सत्ताधारी मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्रेंडशिप डे निमित्त आयोजित ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर, पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी आयोजकाने “मी थेट बावनकुळेंशी बोलेन” अशी उघड धमकी देऊन पोलिसांशी अरेरावी केली.
हा प्रकार म्हणजे कायद्याला न जुमानण्याचा आणि सत्तेच्या माजाचा नमुना आहे का?
राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने आता पोलिसांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. नागपुरात पोलिसांना आता “मी अमुक मंत्र्याशी बोलेन” अशा अरेरावीची भाषा ऐकावी लागणार का? अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा ट्रेंड पुढे सुरू राहिला, तर प्रत्येक नागरिक उद्या म्हणेल — “मी बावनकुळे से बात कर लुंगा!” ही गंभीर बाब आहे आणि यावर ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
सध्या शहरात सत्तेचा माज चढलेल्यांवर कोण रोख आणणार? यावरही चर्चा रंगू लागली आहे.
काय घडलं होतं?
३ ऑगस्टच्या रात्री कामठी रोडवरील एडन ग्रीन्स रिसॉर्ट येथे ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ या कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोंधळ थांबवण्यासाठी संगीत बंद करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयोजकांकडून उर्मटपणे पोलिसांशी अरेरावी झाली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आयोजक पोलिस अधिकाऱ्याला सरळ धमकी देताना दिसत आहे – “मी थेट बावनकुळे यांच्याशी बोलेन.” या प्रकारामुळे राजकीय हस्तक्षेपाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले की, “वाद सुरु होता, आम्ही पोहोचून गोंधळ थांबवला आणि दोन्ही बाजूंची समजूत काढून एफआयआर नोंदवला नाही.” पण आयोजकाकडून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे त्याचबरोबर डीसीपी निकेतन कदम यांनी सांगितले की, व्हिडिओचा तपास सुरू आहे. संबंधित आयोजकाला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल.
कायदेशीर कारवाई होईल का?
हा प्रकार केवळ तपासापुरता सीमित राहतो की खरोखरच संबंधितांवर कडक कारवाई होते, हे लवकरच स्पष्ट होईल. सत्तेच्या नावाने धमकी देणे ही गंभीर बाब आहे आणि पोलिसांवरचा दबाव समाजव्यवस्थेच्या मुळावर घाव घालतो.
जर पोलिसांनाही नावाने धमकावले जात असेल, तर हे लोकशाहीचा अपमान आणि कायद्याच्या राजवटीची थट्टा आहे.




