– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानाची फलश्रुती
किशोर साहू, मौदा ,ता. २:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून नुकतेच मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान सुरू केलेले आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कोदामेंढी प्रशासनाने ग्रामपंचायतच्या छतावर सौर पॅनल लावून सौर ऊर्जेद्वारे गावातील नागरिकांना दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेस दोन तास गरम पाणी उपलब्ध करून देत आहे.
येथील ग्रामपंचायत ची इमारत वार्ड क्रमांक तीन मध्ये स्थित असून, वार्ड क्रमांक तीन चे गोरगरीब नागरिक ऐन हिवाळ्यात थंडीच्या दिवसात सुरू केलेल्या या मोफत गरम पाणीच्या इतर उरलेल्या तीन वार्डाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.

याबाबत वार्ड क्रमांक तीनचेच गरजू नागरिक विद्यानंद बावणे यांना विचारपूस केली असता, मी पण दररोज माझ्या व माझ्या कुटुंबासाठी येथील गरम पाणी घरी नेऊन आंघोळीसाठी वापरत असून माझ्या परिसरातील कुटुंबे ही या पाण्याच्या नियमित वापर करीत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की केंद्राचे व राज्याचे महायुतीचे डबल इंजिनचे सरकार गरिबांसाठी मोफत गरम पाणीच नव्हे तर मोफत राशन, प्राथमिक आरोग्य केंद्रात निशुल्क औषधोपचार, लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या खात्यात दर महिन्याला कोणतेही काम न करता कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोफत पंधराशे रुपये, अंगणवाड्या व जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग एक ते आठपर्यंत सर्वांना मोफत शूज, सॉक्स ,गणवेशासह, शिक्षणही. बसमध्ये महिलांना अर्धी तिकीट. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाच्या सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज, कृषी सन्मान योजना अंतर्गत खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये अशा एक ना अनेक योजना महायुती शासन राबवीत असल्याने त्यांनी व त्यांच्या परिसरातील गरम पाणी वापरणाऱ्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह राज्यातील व केंद्रातील महायुती शासनाचे आभार मानले आहे.




