– भारतीय आर्थिक राष्ट्रवाद व ग्रामविकासाला चालना देण्याचा संकल्प
नागपूर :- स्वाधीनता ग्राम विकास अँड पीस फाउंडेशनच्या नागपूर कार्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्वेताली ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय, व्यवस्थापकीय संचालक स्थपती अभिषेक देशपांडे, पूजा झाम, किशोर धाराशीवकर, राजकुमार गुप्ता, गोविंद पटेल, आरती बडगल, वासल्य भारतीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलतांना श्वेताली ठाकरे यांनी सांगितले की, आचार्य चाणक्यांचे अर्थशास्त्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानववाद आणि भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित आर्थिक विकासाचा प्रसार करणे हे फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, ग्रामविकास आणि शाश्वत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, नागपूर कार्यालय संशोधन, शिक्षण, उद्योजकता, नवोन्मेष, कौशल्य विकास आणि ग्रामीण विकासाचे केंद्र म्हणून कार्य करेल. भारतीय आर्थिक राष्ट्रवाद (Indian Economic Nationalism) या संकल्पनेच्या प्रसारासाठी संशोधन व प्रयोगशाळा उभारून संतुलित, रोजगारा भिमुख आणि शाश्वत भारतीय आर्थिक मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. बी.सी.भारतीय यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद ए. बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशन शिक्षण, ग्रामविकास, सामाजिक समरसता, शांती आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच भारतीय शिक्षण मंडळ आणि रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशन (RFRF) यांच्या सहकार्याने ज्ञानाधिष्ठित उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थपती अभिषेक देशपांडे यांनी वर्ध्याच्या स्वदेशी व स्वाधीनतेच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव करत, महात्मा गांधी आणि राष्ट्रऋषी दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी स्वदेशी, संशोधन, शिक्षण, उद्योजकता, ग्रामविकास आणि आर्थिक स्वावलंबन यांवर भर देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप भारताला समृद्ध, समरस, आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या सामूहिक संकल्पाने झाला.




