खापा, वार्ताहर :- पेच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी परिक्षेत्रातील बफर गावांमध्ये दिनांक २ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महिला बचत गटांसाठी (SHGs) समावेशक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या कार्यक्रमात एकूण २४५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करून मानव–वन्यजीव संघर्ष कमी करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
हा कार्यक्रम अक्षय गजभिये (उपसंचालक, पेच व्याघ्र प्रकल्प, नागपूर), संदीप भारती (सहायक वनसंरक्षक, पेच व्याघ्र प्रकल्प, नागपूर) तसेच प्रविण लेले (परिक्षेत्र वनाधिकारी, नागलवाडी परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून निकिता सोमकुंवर (EDC समन्वयक) यांनी काम पाहिले. रिझ्युम सर्व्हिस (RESUME SERVICES) संस्थेकडून अॅड. पल्लवी माटे (प्रशिक्षक) तसेच कोमल आणि शीतल यांनी साधन व्यक्ती म्हणून प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कोलितमारा, मेहकेपर, सर्रा, घाटपेंढरी, ढवळापूर, बनेरा, सावंगी, घाटकुकडा, चारगाव, आवलेघाट, सुवरधरा, मकरधोकडा, मोहगाव, पेंढरी, हेटीखेडा, नागलवाडी, सुरेवणी व महारकुंड या गावांचा समावेश होता.
प्रशिक्षणामध्ये खालील विषयांचा समावेश करण्यात आला :
• संवाद कौशल्ये
• महिला बचत गटांसाठी शासकीय योजना
• विपणन व विक्री तंत्र
• कामाचे नियोजन व उद्योजकता
• आर्थिक व्यवस्थापन व बचत
हा उपक्रम महिला सक्षमीकरण, शाश्वत उपजीविका विकास तसेच मानव आणि वन्यजीव यांच्यातील सुसंवादी सहअस्तित्व यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.
-अक्षय गजभिये, उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प




