– शेतकरी, बेरोजगारी, ड्रग्ज आणि योजनांवर काँग्रेस आक्रमक
हंसराज भंडारा :- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि फसव्या सरकारी योजनांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आता आक्रमक झाला आहे. “सरकारने शेतकऱ्यांची आणि जनतेची क्रूर थट्टा चालवली असून, या अन्यायाविरोधात आम्ही भव्य ‘जलसमाधी आंदोलन’ करणार आहोत,” असा एल्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नाना पटोले यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला खासदार प्रशांत पडोले, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भाषेत केंद्र आणि राज्य सरकारचे वाभाडे काढले.
शेतकऱ्यांच्या घानाची किंमत नाही; धान खरेदीवर ‘लिमिट’ कशासाठी? नाना पटोले यांनी धान खरेदीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला धान सरकार घेत नाहीये. केवळ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केला जातोय. कृषी आणि महसूल विभागाकडे संपूर्ण माहिती असूनही केंद्राच्या इशाऱ्यावर खरेदीवर मर्यादा (Limit) घातली जात आहे. पावसाळ्यातील धान अजूनही खरेदी केंद्रांवर पडून आहे आणि आता उन्हाळी धानही निघाले आहे. सरकारने जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू नये, अशी भूमिका घेतली आहे. २०१४ पूर्वी काँग्रेसच्या काळात धानाला कोणतीही मर्यादा नव्हती, मग आताच ही अट का? पुढच्या काळात एक-एक दाणा खरेदी झालाच पाहिजे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे.”
ड्रग्सचा व्यापार आणि थेट पंतप्रधानांवर निशाणा राज्यातील ड्रग्जच्या विळख्यावर बोलताना पटोले यांनी खळबळजनक विधान केले. “आज ड्रग्जची थेट जिल्हा परिषद शाळांपर्यंत पोहोचली आहेत. सरकार मनःतो आम्ही पकडतो,आम्ही पाहतो हा ड्रग्स चा जो सूत्रधार आहे त्यांच्या इशाऱ्यावर सरकार चालतोय. हा संपूर्ण ड्रग्स समुद्राच्या माध्यमातून होतोय येणाऱ्या या ड्रग्जच्या व्यापारावर कारवाई का होत नाही? कारण तो मोदी सरकारचा प्रमुख माणूस आहे. मोदी स्वतः जगभरात जाऊन त्या देशातील कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे काम करतात आणि इकडे तरुण पिढी बरबाद होत आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकार करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
‘लाडकी बहीण’ आणि ‘बेईमान भाऊ’ राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करताना पटोले म्हणाले, “ही योजना केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणली आहे. दीड हजार रुपयांचा जीआर काढला, पण आता दुसऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या आशा वर्कर, ग्रामसेवक आणि अनेक बहिणींची नावे कापली जात आहेत. ही बहिणींची निराशा आहे. सत्तेत बसलेल्या या ‘बेईमान भावां’विरोधातही आमचे हे आंदोलन आहे.”
‘हर घर जल’ की ‘हर घर फेकूगिरी’? पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टवर टीका करताना पटोले म्हणाले की, “गावागावात रस्ते खोदून ठेवलेत, पाईप टाकलेत, पण नळात पाणीच नाही. केंद्र सरकारने पैसे देणे बंद केल्याने कंत्राटदारांनी कामे सोडून दिली आहेत. मोदींची ही ‘फेकूगिरी’ आता जनतेसमोर उघडी पडली आहे. हे डबल इंजिन सरकार पूर्णपणे फेल झाले असून योजनांची दुरावस्था झाली आहे.”
मनरेगा बंद करून मजुरांचा छळ “काँग्रेसने सुरू केलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) या सरकारने तांत्रिक कारणास्तव बंद पाडली आहे.आणि नवीन योजना आणली आहे, वर्षाला सव्वाशे दिवस कामाचे आश्वासन देणारे पंतप्रधान आज तोंडघशी पडलेत. ऑनलाईन हजेरी आणि ‘फेस रीडिंग’च्या अटीमुळे मजुरांना काम मिळत नाहीये. गावात नेट चालत नाही, त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकांना लोकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत,” अशी व्यथा त्यांनी मांडली.
भेल आणि पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न भंडारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे सांगत त्यांनी सरकारला इशारा दिला की, “गोसेखुर्द आणि इतर प्रकल्पातील विस्थापितांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करा. भेल (BHEL) आणि रोहना प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या गेल्या, पण तिथे प्रकल्प उभा राहिला नाही. एकतर तिथे उद्योग सुरू करा, अन्यथा त्या जमिनी मूळ मालकांना परत करा.”
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नाना पटोले यांनी सरकारला खुले आव्हान दिले आहे. “शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने जलसमाधी ठिकाणी येऊन आमच्या सर्व प्रऱ्नाची त्वरित दखल घेऊन प्रश्न सोडवावेत.