हंसराज, प्रतिनिधी भंडारा सावरी :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समता विचार मंच, इंदिरानगर सावरी यांच्या वतीने वर्ष ८ वा संयुक्त जयंती महोत्सव दि. १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम अंगणवाडी जवळील पटांगण, इंदिरानगर सावरी येथे पार पडणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. १० जानेवारी) सकाळी ९ वाजता सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ४ वाजता भीमगिरी पहाडी, राजेदहेगाव येथून ढोल-ताशा, लेझीम, दांडपट्टा या पारंपरिक खेळांच्या गजरात समता मिरवणूक निघणार असून मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक भिमा पाटील व सरपंच गिरीश ठवकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मदनपाल गोस्वामी व सरपंच स्वाती हुमणे उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी ६ वाजता शरणंम डान्स ग्रुप यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार परिणय फुके, आमदार राजू कारमोरे, माजी आमदार चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत होणार असून प्रमुख मार्गदर्शक योगेश चिंतामण शेंडे राहणार आहेत.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. १२ जानेवारी) सकाळी ९ वाजता कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून भजन, कीर्तन, नाटक, गोंधळ, दंडार, तमाशा अशा विविध लोककला सादर करण्यात येणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन शाहीर ब्रह्मा नवघरे व लोकशाहीर अंबादास नागदेवे यांच्या हस्ते होणार असून सहभागी कलाकारांना आयोजकांतर्फे मोफत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता मुशायरा / कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून नामवंत कवी व लेखक सहभागी होणार आहेत.
या तीन दिवसीय महोत्सवात स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून नागरिकांनी व कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता विचार मंच, इंदिरानगर सावरी, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.




