– वारीसपुरा येथील श्री गणपतराव वस्ताद अखाडा परिसरातील वीजखांब कार्यान्वित करण्याची मागणी; माजी नगरसेवक श्रावण केळझरकर यांचे नगराध्यक्षांना निवेदन
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील वारीसपुरा येथील श्री गणपतराव वस्ताद अखाडा परिसरात प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठी बसविण्यात आलेले वीजखांब गेल्या दोन वर्षांपासून कार्यान्वित न झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून रखडलेली वीज व्यवस्था तातडीने सुरू करावी, अन्यथा तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक श्रावण केळझरकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परिसरात वीजखांब उभारण्यात आले असले तरी त्यांना अद्याप वीजजोडणी देण्यात आलेली नाही. परिणामी संपूर्ण परिसर रात्री अंधारात राहतो. पावसाळ्यात या परिस्थितीमुळे अपघात व इतर अनुचित घटना घडण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
वीज विभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन वीजखांब कार्यान्वित करून परिसर प्रकाशमय करावा. अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रावण केळझरकर यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी दिलीप करंडे, विकास वैद्य, दिनेश सूर्यवंशी, अश्विन पारसे, सतनू नन्हे, अश्विन करनुडे, तुषार पारसे, कुणाल ढोके आदी उपस्थित होते.




