हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याची वार्ता अत्यंत धक्कादायक असून, या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे एक खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष (आशु) गोंडाने यांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या शोकसंदेशात आशिष गोंडाने म्हणाले की, “अजितदादांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण यामुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात माझी त्यांची शेवटची भेट झाली होती, त्यावेळी त्यांच्या कामाची पद्धत आणि हजरजबाबीपणा जवळून अनुभवता आला होता. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.”
अजितदादांसारख्या कर्तृत्ववान नेत्याचा असा अपघाती अंत होणे हा महाराष्ट्रासाठी ‘काळा दिवस’ आहे. त्यांच्या निधनाने राज्याने एक समृद्ध अनुभवी नेतृत्व गमावले आहे, असेही गोंडाने यांनी म्हटले आहे.




