मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, ओव्हरलोड वाहने आणि रस्त्यांची दुरवस्था या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर पर्यावरण विभाग, परिवहन विभाग आणि गृह विभाग या विभागासमवेत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, अभिजीत वंजारी, कृपाल तुमाने, डॉ परिणय फुके यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोळसा वाहतुकीदरम्यान काही अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखा आणि परिवहन विभाग यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य दर्जाचे आच्छादन अनिवार्य करण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून त्यासाठी पर्यावरण विभागाकडून आवश्यक स्पेसिफिकेशन घेण्यात येणार आहे. तसेच ओव्हरलोड वाहतूक रोखण्यासाठी पोलिस आणि आरटीओ विभागाच्या फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा खनिज निधीतून चंद्रपूरमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावरचा ताण कमी करण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्सकडून सुमारे ४८० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याद्वारे जवळपास १० मिलियन टन कोळसा रस्त्याऐवजी रेल्वे मार्गाने वाहतूक करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून संबंधित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष आरोग्य युनिट सुरू करण्याबाबतही सूचना दिल्या जाणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.




