नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या कौशल्य विकास केंद्राने विकसित केलेल्या तलावातील जलपर्णी वनस्पतीपासून विविध गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ५ ऑगस्ट) पारडी येथील कौशल्य विकास केंद्रात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधवी खोडे-चवरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त वैष्णवी बी. उपस्थित राहणार आहेत. तलावातील निरोपयोगी अशा जलपर्णी वनस्पतीपासून आता गृहोपयोगी वस्तू तयार होत असल्याने यातून महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. या प्रसंगी जलपर्णीपासून तयार करण्यात आलेल्या विविध कलात्मक वस्तूंची प्रदर्शन सुद्धा लावण्यात येणार आहे. जलपर्णीपासून कलात्मक वस्तू भद्रावती, चंद्रपूर येथील अजय बहूद्देशिय संस्था द्वारे तयार करण्यात आली आहे.
नागपूर शहरातील अंबाझरी तलावासह इतर तलावांमध्ये जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. या वनस्पतीमुळे तलावातील प्रदूषण वाढते. या निरोपयोगी जलपर्णीपासून वस्तूंची निर्मिती करण्याचा प्रकल्प समाज विकास विभागाच्या कौशल्य विकास केंद्राने राबविण्याचा निर्णय घेतला. या वनस्पतीच्या पानांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू तयार करण्याचा प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला. नागपूर महानगरपालिका व डे एनयूएलएमच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी शहरातील महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना जलपर्णीची पाने तोडण्याचे काम देण्यात आले. तसेच या महिलांना या पानांपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. उपयोगात येणाऱ्या वस्तू या केंद्रात तयार करण्यात येत आहे. यामुळे जलपर्णीसारख्या वनस्पतीला तलावातून नष्ट केले जात आहे. तसेच या पानांपासून गृहोपयोगी वस्तू तयार केल्या जात आहे. हा नागपूर महापालिकेचा अभिनव असा उपक्रम ठरला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.




