नवी दिल्ली १२ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा आरोप करताना म्हटले की, “पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम राबवली जात आहे.” इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
गडकरी म्हणाले की, इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराविरोधात ठरवून लॉबिंग केले जात आहे. काही स्वार्थी गट हा बदल अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या संदर्भातील याचिका फेटाळून लावली असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.
ते दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. E-20 पेट्रोल (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) संदर्भात वाढत्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना गडकरी म्हणाले, “लॉब्या सर्वत्र आहेत आणि त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत.”
एप्रिल २०२३ मध्ये निवडक पेट्रोलपंपांवर ई-२० पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले होते, तर एप्रिल २०२५ पासून ते देशभरात लागू करण्यात आले.
गडकरी यांनी स्पष्ट केले की, इथेनॉलयुक्त पेट्रोलचा कार्यक्रम हा भारताच्या कच्च्या तेलावरील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. “आपली आयात २२ लाख कोटी रुपयांची आहे. हा उपक्रम केवळ उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा परकीय चलन वाचवण्यासाठी नाही तर ऊस व धान्यावर आधारित इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठीही डिझाइन केला आहे,” असे गडकरी म्हणाले.




