संजय कारवटकर, यवतमाळ १९ : जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन तब्बल दोन ते अडीच महिने उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना अजूनही दुसरा गणवेश मिळालेला नाही. याआधी शाळा व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच दोन्ही गणवेश उपलब्ध करून दिले जात, मात्र यंदा १५ ऑगस्टही उलटून गेला तरी परिस्थिती बदललेली दिसत नाही.
शासन वारंवार विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच गणवेश देण्याची ग्वाही देत असले तरी प्रत्यक्षात आश्वासने फोल ठरत आहेत. आतापर्यंत फक्त एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत असून रोज तोच गणवेश परिधान करावा लागत आहे. दोन ते अडीच महिने उलटून गेल्यानंतरही दुसरा गणवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे मोठे हाल होत आहेत.
शासनाच्या विविध जीआर काढण्याच्या घोषणांचा प्रत्यक्षात अमल होताना दिसत नाही. “विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नेमका केव्हा मिळणार?” हा प्रश्न पालकवर्ग आणि विद्यार्थी यांच्यातून सातत्याने विचारला जात आहे.




