– जनसंवाद विभागातील वादविवाद स्पर्धेतील सूर
नागपूर :- ‘देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसून, जबाबदारीच्या कृतीतून व्हावी प्रकट’ असा सूर वादविवाद स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागात गुरुवार, दि.१७ ऑक्टोंबर २०२५ रोजी ही वादविवाद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे आयोजन ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते.
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग प्रमुख प्रबास साहू यांनी भूषविले. ‘आजच्या तरुणाई मधील देशभक्तीची भावना कमी झाली आहे का?’ या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेची सुरूवात ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांद्वारे आजच्या पिढीतील देशभक्तीची नवी रूपे, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि डिजिटल युगात देशसेवेचे बदलते माध्यम यावर सखोल चर्चा केली. काही विद्यार्थ्यांनी तरुण पिढी देशभक्ती कृतीतून दाखवत असल्याचे नमूद केले, तर काहींनी आधुनिक जीवन शैलीमुळे ती भावना हळूहळू फिकट होत असल्याचे मत व्यक्त केले. दोन्ही बाजूंचा मुद्देसूद वादविवाद वातावरण रंगतदार करून गेला.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘आनंदमठ’ या कादंबरीत लिहिलेल्या या गीतास येत्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रसंगाचे औचित्य साधत विभागाने हा उपक्रम राबविला. स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. अक्सा बक्सरवाला हिने प्रथम क्रमांक, मानसी तुमडाम हिने द्वितीय क्रमांक आणि तनुजा मडावी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच क्रीतीका मिश्रा, राधिका विश्वकर्मा, ममता राजपूत आणि अमोल राठोड यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे विशेष कौतूक करण्यात आले. संचालन डॉ. मनीषा मोहोड यांनी केले, तर डॉ. धर्मेश धावनकर यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे आणि विषयावरील जाणिवेचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. प्रा. श्रुती सांगोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सभागृहात विद्यार्थ्यांचा जोश, तर्कशुद्ध विचार आणि देशप्रेमाचा आविष्कार पाहून वातावरण देशभक्तीमय झाले.




