– १८० पैकी १५० गुण मिळवत श्रेयशी चव्हाण तालुक्यातून प्रथम; गुरुकुल क्लासेसने जपली यशाची परंपरा
हंसराज,प्रतिनिधी भंडारा पवनी :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या सत्रासाठी घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा’ (NMMS) मध्ये पवनी येथील गुरुकुल सी पी एस (CPS) क्लासेसने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत क्लासेसमधील एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गतवर्षीच्या एनएमएमएस परीक्षेतही गुरुकुल सी पी एस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भंडारा जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. याच यशाची पुनरावृत्ती करत यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
श्रेयशी चव्हाण तालुक्यात पहिली
जाहीर झालेल्या निकालात श्रेयशी विवेक चव्हाण हिने १८० पैकी १५० गुण मिळवून तालुक्यात सर्वाधिक गुण घेण्याचा मान पटकावला आहे. तसेच ती आपल्या शाळेतूनही प्रथम आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रेयशी चव्हाण (१५० गुण), ओम बावनकर (१४९ गुण), उन्नती पडोळे (१४२ गुण), श्लेषा दहिवले (१२३ गुण), सुमेध भांडारकर (११९ गुण), स्वयंम धनंजुळे (१०६ गुण) आणि रेणू माेहाडीकर (१०५ गुण) यांनी १०० हून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे. याव्यतिरिक्त इतर १५ विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल बोलताना क्लासेसचे संचालक रवी भिसेकर म्हणाले की, “मार्गदर्शक शिक्षकांचे योग्य नियोजन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली अपार मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे.” या यशाबद्दल रवी भिसेकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या घवघवीत यशाबद्दल पवनी परिसरातील नागरिक, शिक्षणप्रेमी आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




