spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करा !

– संकटग्रस्त कुटुंबांना शासनाने तातडीने दिलासा देण्याची रुपेश वाळके यांची मागणी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना शासनाकडून दिली जाणारी १ लाख रुपयांची आर्थिक मदत अत्यंत अपुरी असल्याचे सांगत ही मदत किमान ५ लाख रुपये करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश प्रकाशराव वाळके यांनी केली आहे.

शेतीतील वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, पिकांचे नुकसान, बाजारभावातील अनिश्चितता आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदारांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाची परतफेड आणि शेतीचा खर्च अशी मोठी जबाबदारी येते.

अशा कुटुंबाला केवळ १ लाख रुपयांची मदत देऊन त्यांच्या अडचणी दूर होणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने सध्याच्या मदतीचा फेरविचार करून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सवलती, कुटुंबातील सदस्यांना रोजगाराच्या संधी, शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री तसेच शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याची गरज आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी स्वतंत्र प्रभावी धोरण आखावे, अशीही मागणी करण्यात आली.

“शेतकऱ्याच्या कुटुंबावर संकट कोसळल्यानंतर शासनाची मदत ही त्यांच्या जखमेवर मलमपट्टी करणारी असली पाहिजे; औपचारिकता पूर्ण करणारी नव्हे. १ लाख रुपयांची मदत आजच्या महागाईच्या काळात अत्यंत अपुरी आहे. शासनाने संवेदनशील भूमिका घेत मदत ५ लाख रुपये करून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मदतीसाठी वारसदारांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येऊ नये, तर शासनाने संवेदनशीलतेने त्यांच्या दारापर्यंत मदत पोहोचवावी. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत ही उपकाराची नव्हे, तर संकटाच्या काळात मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे.”

— रुपेश वाळके अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मोर्शी तालुका


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.