नागपूर, दि. २९ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत इंडो-इस्राईल आंतरराष्ट्रीय करारानुसार राज्यात केशर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायतबाग, जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोली, जिल्हा रत्नागिरी, संत्रा गुणवत्ता केंद्र, नागपूर व डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरी जिल्हा अहिल्यानगर अशी 4 केंद्र स्थापन झाली आहेत.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व एकात्मिक फर्लोत्पादन विकास अभियानांतर्गत गुणवत्ता केंद्र स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य केंद्र व राज्य शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर गुणवत्ता केंद्रामार्फत केशर आंबा, हापूस आंबा, संत्रा व डाळिंब या फळपिकांचे लागवड तंत्रज्ञान विषयी विविध प्रात्याक्षिके घेतली जातात. तसेच सदरची गुणवत्ता केंद्रे या फळपिकांचे तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील कार्यरत आहेत. गुणवत्ता केंद्र स्थापन करण्यामागे केंद्र शासन व इस्त्राईल दुतावास यांचा उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटिका उभारून उच्च प्रतिचे कलमे व रोपांचा शेतकऱ्यांना पुरवठा करणे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्याच्या दृष्टीने विस्तार कार्य करणे असा उद्देश आहे. त्यानुसार, सदर गुणवत्ता केंद्रामार्फत दर्जेदार कलमे /रोपांचे उत्पादन करण्यात येत असून आतापर्यंत एकुण 11,26,144 कलमे रोपांचे उत्पादन करण्यात आले आहे.
गुणवत्ता केंद्रामार्फत आतापर्यंत एकुण 1,44,397 शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचे एकुण 10,095 अधिकाऱ्यांना व 1,979 मास्टर प्रशिक्षक यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मशिनद्वारे छाटणीबाबत प्रात्यक्षिके गुणवत्ता केंद्राचे प्रक्षेत्रावर घेण्यात आली आहे.
गुणवत्ता केंद्रामार्फत नजीकच्या 5 गावातील 15 शेतकऱ्यांना फळबागेच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध टप्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशिक्षण गुणवत्ता केंद्रावर देण्यात यावे. जेणेकरून गुणवत्ता केंद्रावरील तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात येऊन फळपिकाचे उत्पन्न वाढून शेतक-यांना आर्थिक फायदा होईल व त्यांचे जीवनमान उंचावेल.




