जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक
यवतमाळ, ०९ : नवीन उद्योग सुरु करण्यासोबतच अस्तित्वातील उद्योगांना उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून उद्योग वाढीस प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग येण्यास चांगले वातावरण तयार करण्यासह उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करा. प्रलंबित समस्या तातडीने निकाली काढा, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग मित्र समितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशील गरूड, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, परिवहन, कामगार, पोलिस, भूमि अभिलेख आदी विभागाचे अधिकारी व उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील काही औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, अखंडीत वीज, पाणी व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे उद्योजकांनी सांगितले. काही ठिकाणी भूखंडाची मोजणी, सिमांकन नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ज्याज्या ठिकाणी आवश्यक सोई सुविधा उपलब्ध नाही तेथे त्या निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मारेगाव, उमरखेड येथे उद्योजकांना भूखंड वितरीत करण्यात आले परंतू या भूखंडाचा ताबा देण्यात आला नसल्याच्या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. औद्योगिक वसाहतींमध्ये सुरक्षा, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण, स्वच्छता, वसाहतींमध्ये अतिरिक्त भूखंड, उमरखेड येथील औद्योगिक वसाहतीच्या फिडरला देण्यात आलेले ईतर वीज कनेक्शन, औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा व दुरसंचार कनेक्शन, पुसद औद्योगिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. संबंधित विभागांनी मुद्यांवर वेळेत कारवाई करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.





