महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील तेजस्वी आणि कृतीशील व्यक्तिमत्त्व म्हणजे संत गाडगेबाबा. स्वच्छता, समाजसुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवसेवा हीच त्यांची खरी ओळख होती. जाणकार सांगत की त्यांचे औपचारिक शिक्षण अल्प होते. असे असतानाही उच्च विचारांची श्रीमंती त्यांच्या जीवनातून प्रकर्षाने दिसून येते ती आपण वाचत, अनुभवत असतो. अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे जन्मलेल्या या महान संताने संपूर्ण महाराष्ट्राला समाजजागृतीचा प्रभावी संदेश दिला. ते केवळ संत नव्हते, तर “चालतं-बोलतं विद्यापीठ” होते.
कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना स्वच्छतेचे, शिक्षणाचे आणि नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले. ज्या गावात ते जात, तेथे प्रथम स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता करत आणि नंतर कीर्तनातून सांगत, “देव मंदिरात नाही, तो स्वच्छतेत आणि सेवेत आहे.” त्यांच्या विचारांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि व्यसनाधीनतेवर कठोर प्रहार केला. त्यांच्या कीर्तनातून व्यक्त झालेले विचार आजही मानवकल्याणासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचे विचार म्हणजेच एक चालते-बोलते विद्यापीठ होय.
धर्माचा खरा अर्थ मानवतेत आणि सेवेत आहे, हा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त मी, उमेश महादेवराव ढोणे, त्यांच्या विचारांचा पाईक म्हणून संत गाडगेबाबांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो.
– उमेश महादेवराव ढोणे




