कामठी :- खरीप हंगाम २०२६ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून आपल्या पिकांचे विमा संरक्षण निश्चित करावे, असे त्यांनी सांगितले.
योजनेअंतर्गत प्रमुख खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर विमा संरक्षण व शेतकरी हप्ता निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कापूस पिकासाठी ₹६५,००० विमा संरक्षण असून शेतकरी हप्ता ₹६५०, सोयाबीन पिकासाठी ₹६२,५०० विमा संरक्षण व ₹१,२५० हप्ता, तूर पिकासाठी ₹४७,००० विमा संरक्षण व ₹४७० हप्ता, भुईमूग पिकासाठी ₹४५,००० विमा संरक्षण व ₹९०० हप्ता, तर खरीप ज्वारी पिकासाठी ₹३३,००० विमा संरक्षण व ₹६६० हप्ता निश्चित करण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या मोहिमेत अर्ज प्रक्रिया, डिजिटल ई-पीक पाहणी, विमा नोंदणी तसेच नुकसान भरपाईच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवावे, असेही गंगावणे यांनी नमूद केले.
योजनेविषयी अधिक माहिती किंवा अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास संबंधित साहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी केले आहे.




