नागपूर २९ : तामिळनाडू एक्सप्रेस (२७२१/२७२२) व संघमित्रा एक्सप्रेस (२२९५/२२९६) या गाड्यांमध्ये नागपूर ते बैतूल, नागपूर ते ईटारसी दरम्यान अनाधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या अवैध वेंडर्सकडून गाड्यांमध्ये सर्रास खाद्य पदार्थ विकले जात असून यामुळे रेल्वेला होणाऱ्या महसूलाचा तोटा, प्रवाशांच्या आरोग्याचा धोका, आणि प्रतिबंधित वस्तूंची विक्री हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
रेल्वेच्या नियमानुसार गाडीत खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवाना आवश्यक असतो. अधिकृत कंत्राटी विक्रेत्यांकडून नियोजित दराने स्वच्छता आणि गुणवत्ता राखून खाद्यपदार्थ पुरवले जातात. मात्र, हे नियम धाब्यावर बसवत, योगेश, रामू, विवेक यांसारखे अनधिकृत विक्रेते दररोज गाडीत खाद्यपदार्थ विकत आहेत.
चने, भेळ, पॉपकॉर्न, बिर्याणी, आईसक्रीम आणि अगदी गुटखासुद्धा खुलेआम विकला जातो. हे पदार्थ कुठे आणि कसे तयार केले गेले, याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे.
रेल्वेत आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) आणि जीआरपी (गुप्त पोलिस) या दोन सुरक्षा व्यवस्था कार्यरत असतानाही, गाड्यांमध्ये अनधिकृत वेंडर्सचा सुळसुळाट का होत आहे, हा प्रश्न प्रवाशांच्या मनात आहे. अशा विक्रेत्यांकडून कोणताही परवाना फी न घेतल्यामुळे रेल्वेचा महसूल बुडत आहे.
“मोबाईल चोरीचे प्रकार, अनधिकृत विक्रेत्यांची वाढती संख्या यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित झाला आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्याने जर एखाद्याची तब्येत बिघडली, तर जबाबदार कोण?”
– सूरज खापर्डे, जागरूक प्रवासी
या प्रकरणाकडे रेल्वे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. समन्वयाच्या अभावामुळे अनधिकृत विक्रेत्यांना फोफावण्यास वाव मिळतो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी मिळून कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात, अन्न विषबाधा यासारख्या घटनांमध्ये निष्पाप प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात.
@filephoto




