– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई :- जनाब संजय राऊत, तुम्ही विचारांची, हिंदुत्ववादाची बोली लावून मुख्यमंत्रीपद मिळवले होते हा इतिहास आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बोली लावून नाही तर जनतेच्या आशीर्वादाने ठरते आणि देवेंद्र फडणवीस च्या पाठीशी महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. जनता भाजपा आणि महायुतीच्या बाजूने असल्याने तुमच्यासारख्या कावळ्यांच्या शिव्याशापाने देवेंद्रजींचे काहीही बिघडणार नाही, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.
रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने का होईना, उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडून प्रत्येक जिल्ह्यात जातील ही चांगली बाब आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावाने आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण असतानाही काँग्रेसच्या दबावापोटी गेले नाहीत यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी प्रायश्चित घेतले पाहिजे. हिंदुत्ववादाचा आणि प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रायश्चित करा आणि महत्त्वाचे म्हणजे पुस्तक पाहून तरी रामरक्षा वाचायला शिका, असे बन यांनी सुनावले.
बन यांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपद कोणाला झेपत नव्हते, हे महाराष्ट्राने कोविडकाळात पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले होते, हे खुद्द शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याने त्याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीत लागला. उद्धव ठाकरेंसारखे घरात बसणारे देवेंद्र फडणवीस नाहीत. कल्याण – डोंबिवली मारहाण प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. त्याची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस, गृह मंत्रालय आणि पोलिस विभाग अतिशय सक्षम आहे. स्वतः एकनाथ शिंदेही गुंडगिरीचे समर्थन करणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले. सर्वसामान्य मराठी माणसाला मारणारे तुम्ही. साधे ट्विट केले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणारे तुम्ही, कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा तुम्ही करू नका, या शब्दात बन यांनी संजय राऊत यांना फैलावर घेतले.
आज मला अपेक्षा होती की वायनाडमध्ये दरड कोसळल्याप्रकरणी संजय राऊत तोंड उघडून बोलतील. राहुल गांधी, प्रियांका गांधींना जबाबदार धरतील. तिथल्या सरकारला शिव्याशाप घालतील, असे नमूद करत श्री. बन म्हणाले, संजय राऊत यांनी मात्र त्या घटनेबद्दल अवाक्षरही काढले नाही. कारण काँग्रेसची गुलामी करण्यात त्यांना धन्यता वाटत आहे. एक लक्षात घ्या, भरपावसात मेट्रो सुरू आहे. कनेक्टिंग लिंक, कोस्टल रोड आणि अटल सेतूही सुरळीत सुरू आहे. मात्र तुमच्या पक्षाला लागलेली गळती गेल्या चार वर्षात थांबायचे नाव घेत नाही. त्याकडे जरा लक्ष द्या आणि मग इतरांना शहाणपण शिकवा.
महाराष्ट्रातले चंपत राय कोण आहेत, हे सांगण्यापेक्षा संजय राऊत आपण स्वतः संपतराव आहोत हे तुम्ही सांगा. पक्ष संपवण्याची सुपारी घेतल्याने महाराष्ट्राचे संपतराव कोण असतील तर तुम्ही आहात. गिरीश महाजन हे अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करण्याचे काम करत असल्याने जनतेने त्यांना सहा – सहा वेळा निवडून दिले. अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कुंभमेळा पार पाडला जाईल. कुठेही गैरप्रकार होणार नाही, असे बन यांनी स्पष्ट केले.




