नागपूर :- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित , अंशतः अनुदानित व त्यानंतर 100टक्के अनुदानवर आलेल्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम १९८२ नुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी ५ सप्टेंबर २०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने निवेदन सादर केले आहे.

राज्यातील सुमारे २६ हजार पेन्शनपीडित बांधवांना न्याय मिळावा, अशी संघाची मागणी आहे. २५ सप्टेंबरपर्यंत शासनाने स्पष्ट आदेश काढून जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास २८ सप्टेंबरपासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघाने दिला आहे. तसेच २ ऑक्टोबर पासून महात्मा गांधी जयंतीनिमित्त आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण न झाल्यास शिक्षक, कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी व पालक मतदानातून सरकारचा निषेध करतील, असा इशारा संघाने दिला आहे. शासनाने मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.





