बोरी बसस्थानक परिसरात महिलांची व विद्यार्थिनींची गंभीर गैरसोय
संजय कारवटकर यवतमाळ 07 : ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत केंद्र सरकारकडून शासकीय पुरस्कार प्राप्त झालेले बोरी गाव सध्या स्वच्छतेच्या विरोधातले जिवंत उदाहरण ठरत आहे. कारण गावातील बोरी बसस्थानक परिसरात असलेले एकमेव शासकीय स्वच्छतागृह सध्या अतिशय दयनीय स्थितीत असून, हेच स्वच्छतागृह पूर्वी पुरस्कारासाठी निवडले गेले होते.
या स्वच्छतागृहाची साफसफाई, देखभाल व दुरुस्ती पूर्णपणे थांबलेली आहे. इमारत उध्वस्त अवस्थेत असून, परिसरात साचलेली घाण, दुर्गंधी आणि गैरसोयींमुळे या ठिकाणी येणाऱ्या महिलांना व विद्यार्थिनींना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. ही स्थिती अत्यंत लाजिरवाणी व आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.
यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बसस्थानक परिसरात दररोज शेकडो प्रवासी, महिला व विद्यार्थी ये-जा करतात. परंतु मूलभूत सुविधा नसल्यानं शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे. बोरी ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून या स्वच्छतागृहाची मरम्मत, स्वच्छता आणि पुर्नउपयोग सुनिश्चित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे




