पत्रकार राजू कापसे यांना रामटेक विभागाचा देवर्षी नारद पुरस्कार
रामटेक, २० : गेल्या दशकातील भारताची प्रगती पाहता ब्रिटिश मानसिकतेचा अंत झाला आहे असे दिसून येते. परंतु भारताची मूळ संस्कृती, परंपरा, विचारधन नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतो आहे, अशी चिंता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक प्रसाद जी बर्वे यांनी व्यक्त केली. विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित रामटेक विभागाच्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. पौराणिक कथा आणि शास्त्रामध्ये देवर्षी नारदांचे कार्य अतुलनीय असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.
रामजी महाजन देशमुख शाळा रामटेक येथे १७ ऑगस्टला संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्य अतिथी लेखिका शिल्पा ढोमणे, विभाग प्रचार प्रमुख सौगत नंदी उपस्थित होते, तसेच रामटेक प्रचार प्रमुख अजिंक्य खरवडे आणि रामटेक जिल्हा कार्यवाह सुनील नारनवरे कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित होते.
या वर्षीचा देवर्षी नारद सन्मान दैनिक सकाळचे देवलापार येथील वार्ताहर आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे रामटेक तालुका प्रतिनिधी राजू कापसे यांना देण्यात आला. प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविले गेले.
शिल्पा ढोमणे यांनी देवर्षी नारदांच्या गुणांवर प्रकाश टाकला. आजच्या पत्रकारांसाठी ते आदर्श होते, असे सांगून प्रत्येक पत्रकारात एक लेखक दडलेला असतो आणि तो समाजपरिवर्तनासाठी सतत कार्यरत असतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला विविध वर्तमानपत्रांसाठी कार्य करणारे पत्रकार, प्रबुद्धजन तसेच तरुण बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अजिंक्य खरवडे यांनी तर आभार प्रदर्शन सौगत नंदी यांनी केले.




