दौसा १३ : राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप व्हॅनला ट्रकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमींपैकी 9 जणांना जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात हलवण्यात आले असून इतरांचा स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व भाविक उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्यांनी खाटू श्यामजी आणि सालासर बालाजीचे दर्शन घेतले होते. परत येताना दौसाजवळ पिकअप आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या लोकांना स्फोट झाल्याचा भास झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता आणि लोक वेदनेने विव्हळत होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले.
पोलिसांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. सर्व मृतदेह शवागारात ठेवले असून जखमींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.




