spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उबाठा गट आता केवळ तीनच जणांचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष 

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई :- संजय राऊत, तुमच्या पक्षात लोकशाही आहे का याचे आधी उत्तर द्या. उबाठा गटात कुठेही लोकशाही शिल्लक नाही. मुळात लोकशाही असायला तुमच्याकडे लोकच शिल्लक राहिलेले नाहीत. उबाठा हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढ्या तीन लोकांचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे. नितेश राणे यांनी वर्णन केल्याप्रमाणे उबाठा गटाचा आता बचत गट झालाय. बचत गटातही तुमच्या पक्षापेक्षा जास्त सभासद असतात. त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा संजय राऊतांनी करू नयेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

न्यायालयाचा लिखित निकाल हाच अधिकृत असताना सामनाचे कार्यकारी संपादक जनाब संजय राऊत उच्च न्यायालयाच्या निकालावर टिप्पण्या करताहेत. संपादक होण्याची बौद्धिक क्षमता नसल्यानेच उद्धवजींनी त्यांना संपादक केले नसेल. तुम्हाला अग्रलेख लिहायचा असेल तर केंद्रात काँग्रेस सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे पिंजरा, पोपट असे उल्लेख केले होते, त्याबद्दल लिहा. हे जनतेच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने जनतेत असतात. तुमच्यासारखे घरात बसून मातोश्री दोन बांधण्याचे काम आमचे नेते करत नाहीत. तुम्ही आधी आपला पक्ष सांभाळा आणि मग सरकारवर टीका करा, असे बन यांनी सुनावले.

चेंबूर अथवा कालची साकीनाका येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि संवेदनशील असल्याचे सांगून बन म्हणाले, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला. दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन केले. कालच्या प्रकरणात कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्याची हिंमत आम्ही दाखवली. संजय राऊत, तुमचा पक्ष सत्तेत असताना तुम्ही एकातरी अधिकाऱ्यावर कारवाई केली होती का? घटना घडायच्या, माणसे मरायची, त्यासाठी कोणालाही जबाबदार धरले जात नव्हते. महापालिकेत पंचवीस वर्षाचा कारभार करताना तुम्ही कायम अधिकाऱ्यांना पाठीशीच घालत होता. मुंबईत शेकडो माणसे मरत असताना तुम्ही मात्र मातोश्रीमध्ये बसून होता. आमचे अधिकारी, नगरसेवक, मुंबईच्या महापौर स्वतः फिल्डवर राहून काम करताहेत. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे अतिशय उत्तम काम करताहेत. मुंबईच्या प्रश्नावर राजकारण करू नका.

संजय राऊतांना बांगलादेशी नागरिकांचा पुळका

घुसखोर बांगलादेशी नागरिकांना हटवणे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे काम आहे. परंतु संजय राऊत तुम्हाला बांगलादेशींचा एवढा पुळका का येतोय? बांगलादेशी घुसखोरांमुळे मुंबईवरचा ताण वाढतो, हे तुमच्या लक्षात येते का? आम्ही जबाबदारीपासून पळ काढत नाही. मुंबईकरांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही चुका घडल्या तर त्या दुरुस्त करण्याचे कामही आम्ही करतोय. तुमच्यासारखे जबाबदारीपासून पळ काढणारे आम्ही नाही, हे लक्षात ठेवा, असे बन यांनी फटकारले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.