काही माणसे जन्माला येतात आणि काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, पण काही माणसे आपल्या जगण्याला अर्थ देऊन जातात. त्यांच्या शब्दांना काळाची मर्यादा नसते, त्यांच्या आवाजाला मृत्यूची भीती नसते आणि त्यांच्या विचारांना सत्तेची गरज नसते. वामनदादा कर्डक हे अशाच परिवर्तनवादी परंपरेतील एक तेजस्वी नाव. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ एका कवीला अभिवादन करणे नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या त्या असंख्य कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित माणसांच्या आवाजाला सलाम करणे होय. वामनदादांनी कविता केवळ कागदावर लिहिली नाही, त्यांनी ती रस्त्यावर आणली. त्यांनी शब्दांना पुस्तकांच्या कपाटात बंदिस्त केले नाही; तर ते समाजाच्या जखमांवर ठेवले. त्यांच्या गीतांमध्ये दुःख होते, पण हताशा नव्हती, आक्रोश होता, पण अराजक नव्हते, विद्रोह होता, पण माणुसकी हरवलेली नव्हती. म्हणूनच त्यांची कविता ही केवळ साहित्यकृती न राहता जागृतीचे हत्यार बनली.
समाजातील विषमता, जातिभेद, शोषण आणि अज्ञान याविरुद्ध त्यांनी आपल्या लेखणीचा आणि आवाजाचा वापर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेली त्यांची वैचारिक वाटचाल ही केवळ अनुकरणाची नव्हती; ती सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी होती. बाबासाहेबांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश वामनदादांच्या गीतांमधून सामान्य माणसाच्या मनापर्यंत पोहोचला. आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. हातात मोबाईल आहे, माहितीचा महासागर एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण प्रश्न असा आहे की, माहिती वाढली, विवेक वाढला का? शिक्षण वाढले; समता वाढली का? विकास झाला, माणूस मोठा झाला का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना वामनदादांची आठवण अधिक तीव्रतेने होते. कारण त्यांनी ज्या समाजासाठी आवाज उठवला, त्या समाजाच्या अनेक समस्या आजही संपलेल्या नाहीत. जात अजूनही माणसाची ओळख ठरवते. आर्थिक विषमता अजूनही माणसाच्या संधी ठरवते. शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात असमानता अजूनही आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या नावाखाली शोषण सुरूच आहे. संविधानाने समानतेचा अधिकार दिला असला तरी सामाजिक मानसिकतेतील विषमता अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. म्हणूनच वामनदादांचे साहित्य आज संग्रहालयात ठेवण्याची वस्तू नाही, ते आजच्या समाजाला आरसा दाखवणारे जिवंत साहित्य आहे.
वामनदादांच्या काव्यातील सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्यांची लोकभाषा. अवघड शब्दांचा आव न आणता त्यांनी सामान्य माणसाच्या भाषेत मोठे तत्त्वज्ञान सांगितले. त्यांच्या गीतांमध्ये गावकुसाबाहेरचा माणूस होता, श्रम करणारा हात होता, उपेक्षितांचे अश्रू होते आणि परिवर्तनाचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांची कविता विद्वानांच्या चर्चेपुरती मर्यादित राहिली नाही. ती जनतेच्या ओठांवर आली. आज साहित्य आणि समाज यांच्यातील नाते काहीसे सैल होताना दिसते. साहित्यिक अभिव्यक्तीला प्रसिद्धी मिळते, पण सामाजिक बांधिलकीला किती स्थान मिळते, हा प्रश्न आहे. सोशल मीडियावर काही क्षणांत हजारो शब्द लिहिले जातात, परंतु त्या शब्दांमध्ये समाज बदलण्याची तळमळ किती असते? वामनदादांनी आपल्याला शिकवले की लेखन म्हणजे केवळ स्वतःची अभिव्यक्ती नव्हे, लेखणी ही समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे.
त्यांच्या गीतांचा सूर आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कारण तरुणाई ही केवळ लोकसंख्येचा मोठा हिस्सा नाही; ती देशाच्या भवितव्याची ऊर्जा आहे. मात्र या ऊर्जेला दिशा नसेल तर ती सहजपणे द्वेष, अफवा, अंधश्रद्धा आणि उथळ राजकारणाच्या प्रवाहात वाहून जाऊ शकते. अशा वेळी वामनदादांचे साहित्य तरुणांना विवेक, स्वाभिमान, समता आणि बंधुतेची दिशा देऊ शकते. आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो; संविधानाचा गौरव करतो; लोकशाहीची भाषा बोलतो. पण वामनदादांचा प्रश्न आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. ज्या माणसाच्या पोटात भाकरी नाही, ज्याच्या मुलाला शिक्षणाची समान संधी नाही, ज्याला जातीय अपमान सहन करावा लागतो, त्याच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय? लोकशाही केवळ मतदानाच्या दिवशी जिवंत होत नाही. ती माणसाच्या रोजच्या जगण्यात दिसली पाहिजे. समानतेत दिसली पाहिजे. बंधुतेत दिसली पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच्या धैर्यात दिसली पाहिजे. हीच वामनदादांच्या विचारांची खरी दिशा आहे.
त्यांनी समाजाला फक्त रडवले नाही, त्यांनी लढायला शिकवले. त्यांनी दुःखाचे वर्णन केले नाही, तर दुःखाच्या मुळावर प्रहार करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या शब्दांत आत्मसन्मान होता. म्हणूनच त्यांचे साहित्य आजही बहुजनांच्या मनात घर करून आहे. वामनदादांना खरी आदरांजली कोणती? त्यांच्या प्रतिमेला हार घालणे? जयंती साजरी करणे? व्याख्यानमाला आयोजित करणे? नक्कीच, या गोष्टी आवश्यक आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात उतरवणे. जात पाहून माणूस नाकारणार नाही, स्त्री-पुरुष भेद करणार नाही, अंधश्रद्धेला प्रश्न विचारेल, संविधानिक मूल्यांचे रक्षण करेल, अन्याय होताना गप्प बसणार नाही आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःसोबत समाजालाही पुढे नेईल, हीच वामनदादांना खरी मानवंदना ठरेल.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक प्रश्न स्वतःला विचारू या. आपल्या हातातील शब्द समाज जोडत आहेत की तोडत आहेत? आपला आवाज अन्यायाविरुद्ध उठतो आहे की सत्तेच्या सोयीने शांत होतो आहे? वामनदादांनी शब्दांना आवाज दिला, आता आपल्या पिढीने त्या आवाजाला कृतीची जोड देण्याची वेळ आहे. कारण वामनदादा कर्डक हे केवळ एक नाव नाही. ते विद्रोहाचा स्वर आहेत, ते समतेची आस आहेत, ते स्वाभिमानाची ज्योत आहेत, ते परिवर्तनाची हाक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना एवढेच म्हणावेसे वाटते. वामनदादा, तुमची गाणी थांबलेली नाहीत, ती आजही अन्यायाच्या भिंतींवर धडकत आहेत. तुमचा आवाज मावळलेला नाही, तो प्रत्येक जागृत माणसाच्या विवेकातून पुन्हा पुन्हा उमटत आहे आणि जोपर्यंत समाजात विषमता आहे, जोपर्यंत अन्याय जिवंत आहे, तोपर्यंत वामनदादांचा शब्दही जिवंत राहील. हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी मानवंदना!
– प्रविण बागडे





