– जेईई, नीट व एमएचटी-सीईटी विद्यार्थ्यांनासाठी १५ जूनपर्यंत संधी
नागपूर :- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनार्टी) राज्यातील विमुक्त जाती (व्हिजे-ए) तसेच भटक्या जमाती ब, क व ड (एनटी-बी, एनटी-सी व एनटी-डी) नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करीत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणासोबत विद्यावेतनाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देत ‘वनार्टी’ने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग सुकर केला आहे. विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि हेल्पलाईनवरून आलेल्या सातत्यपूर्ण मागण्यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘वनार्टी’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.![]()
याच धर्तीवर २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी ‘वनार्टी’तर्फे जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून, या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ‘वनार्टी’च्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. वनार्टी. इन (www.vanarti.in) या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले असून, सुरुवातीला अर्जाची अंतिम मुदत ३० मे २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या ७८८७८८२०२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची दखल घेत आता अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांच्या यशाची शक्यता अधिक बळकट होईल. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची नितांत गरज आहे. ‘महाज्योती’च्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आता त्याच धर्तीवर ‘वनार्टी’ संस्था विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवी आशा निर्माण करीत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचविण्याचा ‘वनार्टी’चा हा उपक्रम असल्याचेही अतुल सावे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हेच उल्लेखनीय कार्याची पावती : प्रशांत वावगे
यापूर्वी ‘महाज्योती’च्या माध्यमातून बहुजन समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच धर्तीवर आता ‘वनार्टी’ संस्था विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा निर्माण करीत आहे. घरबसल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याची माहिती ‘वनार्टी’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी दिली. राज्यातील विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि विद्यावेतनाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य ‘वनार्टी’ करीत आहे. यापूर्वी ‘महाज्योती’द्वारे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. आता त्याच धर्तीवर ‘वनार्टी’तर्फेही विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात असून, या योजनेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ आणि ‘वनार्टी’ या दोन्ही संस्थांकडे स्वतंत्रपणे अर्ज करता येणार असून, निवड झाल्यानंतर कोणत्याही एका संस्थेकडून विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासोबतच टॅब आणि इंटरनेट डेटाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठे बळ मिळणार आहे. ही योजना विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही प्रशांत वावगे यांनी केले.