– जिल्हा प्रशासन आणि क्षेत्रीय समितीच्या समन्वयातून आयोजन यशस्वी करूया – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर
नागपूर :- श्री गुरु तेग बहादुर यांचे सन-२०२५ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत व्हावा तसेच याचे स्मरण होण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरीता हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भस्तरीय हा कार्यक्रम ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि या कार्यक्रमासाठीच्या क्षेत्रीय समित्यांनी परस्पर समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज प्राथमिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, समितीचे अध्यक्ष गुरमीत सिंग खोखर, उपाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता, समन्वय समिती, क्षेत्रीय आयोजन समिती व विविध कार्यक्रम आयोजन व्यवस्था समित्या स्थापन करण्यात येणार आहे. नांदेड, नागपूर आणि नवी मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात विदर्भातील सर्व जिल्हे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.




